मुंबईमधील बॉम्बस्फोट हे अतिरेक्यांचे कृत्य अत्यंत निर्घृण आहे, मानवतेला काळिमा पुन्हा एकदा फासणारे आहे हे सांगायला नको. त्यामध्ये बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनःपूर्वक सहानुभूती वाटते. कुणाही अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागू नये.
"घटना स्थळी प्रत्यक्ष भेट देणे", एकमेकांवर चिखलफेक करणे, प्राप्त परिस्थितीत तापलेल्या तव्यावर आपापली पोळी भाजून घेणे वगैरे राजकारणी मंडळींचे नेहमीचे उद्योग सुरु झालेच आहेत.
या घटनेची जबाबदारी अजूनही कुणी (म्हणजे अतिरेकी संघटनेने) घेतलेली नाही.
पोलीस, ATS, NSG वगैरे मंडळी त्यांच्या कर्तव्याचा भाग, जबाबदारी म्हणून शोध मोहीम राबवीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येवोच.
पुढे गुन्हेगार पकडले जातील. सरकारी वकील जीवाचे रान करून गुन्हेगाराला फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जातील.
त्यापुढे काय ? माफीचा अथवा दयेचा अर्ज.... सन्माननीय राष्ट्रपतींच्या 'Inbox' मध्ये त्यांच्या निर्णयाची वाट पाहत सुरक्षित राहील आणि मानवतेचे गुन्हेगार सुखात, आनंदात आणि कडेकोट सुरक्षेत उर्वरित आयुष्य भारत सरकारच्या खर्चाने जगतील.
यापेक्षा वेगळे मत आपले असल्यास जरूर सांगा. मला तर याहून निराळे चित्र दिसत नाही.